वाचक लिहितात   

निवडणूक आयोगाची सारवासारवी

विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला यश मिळाले खरे. पण हे यश निर्भेळ होते , की मतदान यंत्रात गोलमाल करून, मिळवलेले यश होते. हा प्रश्न सत्ताधार्‍यांनी स्वतःच्या मनास विचारून पहावा.  मतदान यंत्रात घोटाळा केला जाऊ शकतो. याची खात्री विरोधकांना आहे. नेमका हाच धागा पकडून,  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगासमोर  काही प्रश्न उपस्थित केले  आहेत. राहुल गांधींच्या प्रश्नावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलेले असले, तरी ती त्यांनी केलेली निव्वळ  सारवासारवी  वाटते. राहुल गांधीच्या म्हणण्यानुसार, निवडणूक आयोगाने माझ्या आरोपांना उत्तर दिले असले तरी, ते अधिकृतपणे आयोगाच्या संकेतस्थळावर का दिले नाही? आयोगाने हे स्पष्टीकरण स्वतःच्या एक्स खात्यावर अथवा संकेतस्थळावरही प्रसिद्ध केलेले नाही. याचे  कारण काय? सत्ताधारी पक्षात खरोखरच हिम्मत असेल तर, विरोधकांच्या मागणीनुसार मतपत्रिकेवर निवडणुका घेऊन, त्या 
जिंकून दाखवाव्यात. 

गुरुनाथ मराठे, बोरिवली (पूर्व), मुंबई 

’रीलस्टार’ वर कारवाई करा

सोशल मीडियावर प्रसिध्दी मिळवण्यासाठी तरुण तरुणी धावत्या लोकलमध्ये स्टंट करतात. स्वतः सह सहप्रवाशांचा जीव धोक्यात घालून तरुण तरुणी समाज माध्यमावर फोलॉवर्सची संख्या वाढावी यासाठी असे जीवघेणे स्टंट करतात आणि त्याचे रील बनवून समाज माध्यमावर व्हायरल करतात. अलीकडे तर तरुण तरुणीच नाही तर काही रीलस्टार कलाकार देखील लोकलच्या गर्दीचा फायदा घेत लोकलमध्ये नृत्य करतात आणि त्याचा व्हिडिओ बनवून समाज माध्यमावर टाकतात. काही तरुण तरुणी भररस्त्यात अश्लील नृत्य करून त्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करतात.  सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करणे कायद्याने गुन्हा असतानाही केवळ प्रसिद्धीसाठी असे प्रकार केले जात आहेत. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तथाकथित ’रिलस्टार’ वर प्रशासनाने कारवाई करावी. 

श्याम ठाणेदार, दौंड जि. पुणे

सामान्यांची लूटच

देशातील लोकांचे उत्पन्न पाच लाख रुपये ते एक कोटी रुपयांदरम्यान असणार्‍यांना मध्यमवर्गीय म्हणून सर्वसाधारणपणे ओळखले जाते. या वर्गातील लोकांचे उत्पन्न गेल्या दहा वर्षांत सुमारे ०.४ टक्क्यांनी वाढले त्याचवेळी पाच लाखांहून कमी उत्पन्न असलेल्या लोकांचे उत्पन्न सुमारे ४ टक्क्यांनी वाढले. एका बाजूने पगारी उत्पन्नात जेमतेम वाढ होत असताना किमान खरेदीसाठी कराव्या लागणार्‍या खर्चात वाढच होत चालली आहे. जनतेवर या ना त्या कारणांनी विविध प्रकारचे कर लावून लोकांना हैराण होण्याशिवाय अन्य पर्याय उरलेले नाहीत. काळया पैशांचे व्यवहार रोखले जावेत म्हणून नेट बँकिंग, क्रेडिट,डेबिट कार्ड्स वापरात आणली गेली. आता त्या प्रत्येक सेवेवर शुल्क आकारले जाते. मग माणसे पुन्हा रोखीतील व्यवहारांकडे वळणारच ना.! साहजिकच काळया पैशांची निर्मिती वाढणार, कर वसुली कमी होणार हे समजून कोण घेणार.? वाढीव शुल्क, कर दिल्याशिवाय बरेच व्यवहार पूर्ण होत नाहीत, हि एक प्रकारची सामान्यांची लूटच नव्हे का ?

धोंडीरामसिंह राजपूत, संभाजीनगर.

ऑनलाइन प्रेम प्रकरणे

सोशल मीडिया, मेसेजिंग अ‍ॅप्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मसारख्या डिजिटल माध्यमांद्वारे तरुण - तरुणींमधील रिलेशनशिप्सला मोठ्या प्रमाणात चालना मिळते किंवा एकमेकांना भेटण्याचं एक-दुसर्‍याशी संवाद साधण्याच त्यांच्याशी कनेक्ट राहण्याचं आणि एकमेकांना समजून घेण्याचं हे सध्याचं सर्वांत वेगवान डिजिटल माध्यम आहे. त्यामुळे जगभरातच नव्हे तर भारतातही डिजिटल अफेअर्स सध्या अत्यंत वेगानं लोकप्रिय होत आहेत. पण, त्याचमुळे सायबर गुन्हेगारी वाढल आहे. ’डिजिटल अरेस्ट’सारख्या अनेक गोष्टींना लोक बळी पडायला लागले. मात्र आता त्याच्याही पुढचा टप्पा आहे.तो म्हणजे सायबर रिलेशनशिप्स त्यालाच ’डिजिटल अफेअर्स’ किंवा ’ऑनलाइन अफेअर्स’असंही म्हटलं जातं.तरुण पिढीच्या हातात आलेलं स्मार्टफोन हे अफेअर्स घडविण्याचे मुख्य स्त्रोत आहे.

दत्तप्रसाद शिरोडकर, मुंबई

दहापदरी रस्ता-गरज की अतिरेक?

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आता दहापदरी होणार अशी बातमी वाचनात आली. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग २० वर्षांपूर्वी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून उभारला गेला. त्यामागे कारण होतं - मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या शहरांमधील प्रवासाचा वेळ कमी करणे, औद्योगिक आणि आर्थिक व्यवहार अधिक गतीने होणं आणि जुन्या घाटरस्त्यावरील वाहतूक ताण कमी करणे. या दृष्टीने हा महामार्ग यशस्वी ठरला. पण गेल्या काही वर्षांत वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे आता तो दहापदरी करायचा प्रस्ताव समोर आला आहे. मात्र, आजचा अनुभव सांगतो की, सहापदरी रस्ता असूनही वाहनचालक लेनशिस्त पाळत नाहीत, वेगमर्यादा तोडली जाते आणि अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. यावर उपाय न करता फक्त रस्ता वाढवून खरोखर काही साध्य होणार आहे का? दहापदरी रस्त्यामुळे वेग वाढेल, पण त्याचबरोबर वाहतूक नियमांचं उल्लंघनही वाढेल ही भीती आहे. 

दीपक गुंडये, वरळी

 

Related Articles